25 मार्च 2010

अशी पाखरे येती.. आणिक स्मृती ठेउनी जाती..

"बाळा, एक bad-news आहे." कापऱ्या आवाजात फोनवर आई म्हणाली.
"काय झालं आई ?" माझाही जीव इथे कासाविस.
"अरे.. सर off झाले.."
"क्काय ???"
जेके सर.. गेले...

हे काय ऐकलं मी आता.. काहीच कळेना.. काहीच सुचेना.. पाय जागचा हलेना.. इतका मोठा धक्का मनाला पेलवेना...

जयकीर्ती कळसकर.. उर्फ जे.के. माझ्या मित्रमंडळींपैकी सर्वात साधी आणि सरळ व्यक्ती. राहणीमानानेही आणि मनानेही. कधीही कुणाबद्‍दल मनात कपट नाही की काळंबेरं नाही.. कुणाच्या अध्यात ना मध्यात.. ना कधी कुणाला दुखावलं असेल. कुठल्या गोष्टीचं चेहऱ्यावर कधी tension नाही. एकदम 'cool' आणि प्रसन्न असं व्यक्तिमत्व.

आमची ओळख मी VJTI मध्ये B.E. च्या third year ला असल्यापासूनची. जेके सर तेव्हा M.Tech. च्या first year ला होते. M.Tech. च्या विद्यार्थ्यांना teaching assistantship म्हणून professors ना काहीतरी मदत करावी लागते. तसेच जेके सर हे आम्हाला कुठल्यातरी practical ला assistant म्हणून होते. तसे इतर practicals ना M.Tech. चे इतर विद्यार्थीही assistant म्हणून होते आम्हाला. त्यांची आम्ही B.E. वाले लोक मनसोक्त टिंगल करत असू. पण जेके सरांविषयी मात्र सुरुवातीपासूनच मनात आदर निर्माण झालेला. म्हणून तर वयाने फक्त २-३ वर्षं मोठे असूनही मी त्यांना तेव्हापासूनच ’जेके सर’ असंच संबोधत आलोय.

जसा जसा परिचय वाढत गेला, तसं तसं ओळखीचं रुपांतर मैत्रीत होऊ लागलं. Final year ला आम्ही दोघेही एकाच professor खाली project करत असल्याने एकाच lab मध्ये काम करू असू. त्यामुळे गप्पागोष्टी तर नेहमीच रंगू लागल्या. अगदी technical विषयांपासून ते gossips पर्यंत सगळं सगळं. काही जवळचे मित्र सोडले, तर माझ्या वर्गातल्या मुलांपेक्षाही मला जेके सरांविषयी अधिक ओढ आणि जवळिक निर्माण झाली होती. काही व्यक्तींशी ’तार जुळणे’ म्हणतात ना, तसंच काहीसं. गणपतीला आमच्या घरी भेट देऊन गेल्यामुळे आईलाही त्यांचा चांगला परिचय झालेला.

आठव्या semester मध्ये माझा GATE चा निकाल लागला. तेव्हा तर M.Tech. साठी कोणत्या colleges ना apply करायचं, कोणत्या college मधली कोणती branch चांगली आहे, forms कुठे विकत घ्यायचे आणि कसे भरायचे, या सगळ्या बाबतीत जेके सरांनी जितकं मार्गदर्शन आणि मदत केली असेल, ते मी कधीच विसरू शकणार नाही. IISc ला फक्त काही Top Rankers ना admission मिळते, अशा समजाने मी तर form ही विकत घेणार नव्हतो. फक्त जेके सरांच्या आग्रहाखातर मी IISc चा form भरला. त्यातही मला अमुक एका branch मध्ये त्यावेळेस विशेष रस वाटत असल्याने मी तो एकच option भरणार होतो. पण त्यांनी मला दटावलं, "IISc तला C.E.D.T. (Center for Electronics Design and Technology) हा भारतातला नंबर १ course आहे electronics साठी. तेव्हा बाकी काही नाही भरलंस तरी चालेल. पण तो option सोडू नकोस." IISc तल्या कुठल्यातरी मित्राला फोन लाऊन त्यांनी CEDT विषयी माझं शंकानिरसनही करून दिलं.

पुढे CEDT तून Test आणि Interview साठी call आला. Test आणि Interview देऊन आलो. आणि एके दिवशी CEDT मध्ये admission मिळाल्याचं पत्र घरी आलं. कित्ती कित्ती आनंद झालेला म्हणून सांगू. पण हा आनंद share करायला सगळ्यात पहिला phone मी कुणाला केला असेल. अर्थातच जेके सरांना. कारण या आनंदावर आईच्या आशिर्वादांनंतर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो जेके सरांचा. त्यांच्या आग्रहाशिवाय तर मी CEDT चा option ही भरणार नव्हतो.

पुढे म.तेच. साठी मी बॅंगलोरला निघून आलो. आणि सर नोकरीसाठी मुंबईलाच roommates सोबत राहू लागले. सुरुवातीला वरचेवर फोनाफोनी होत असली, तरी नंतर अभ्यासाच्या नादात म्हणा, किंवा नव्या विश्वात हरवून गेल्यामुळे म्हणा, phones ची संख्या कमी कमी होत गेली. चॅटिंगही रोडावत गेलं. बऱ्याच महिन्यांनी ते एकदा online दिसल्यावर मी ping केलं. तर तेव्हा म्हणाले, की ते महिनाभर हॉस्पिटलमध्ये होते. पण details काही सांगितल्या नाहीत. न रहावून मी दुसऱ्या एका मित्राला फोन लावला, तर त्याच्याकडून कळलं, की सरांच्या दोन्हीही किडन्या fail झाल्यात. त्यासाठीच त्यांना महिनाभर हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलेलं.

माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. एक अतिशय साधी सरळ आणि निर्व्यसनी व्यक्ती.. कुणाच्या अध्यात ना मध्यात.. आणि देव त्यांच्यासोबत हे असं निष्ठुर कसं वागू शकला !! कधी एकदा त्यांना जाऊन भेटतोय असं झालं. पण भेट मात्र माझं semester संपल्यावरच शक्य झाली. त्यांना पाहून माझे डोळेच भरून आले.. चेहरा आणि अंग तर पार सुकून गेलेलंच, पण चेहऱ्यावरचं तेज पण त्या आजाराने पार लुटून नेलेलं. त्यांना भेटायला तेव्हा माझे अजून १-२ मित्र सोबत होते म्हणून बरं. नाहीतर मला काय बोलू अन कसं बोलू, काहीच कळत नव्हतं. आठवड्यातून दोनदा dialysis करून जगत होते बिचारे. पण तरीही बोलण्यात कुठेही निराशा नव्हती. चेहऱ्यावरचं तेज जरी हरवलं असेल, पण मनातली हिम्मत आणि जिद्द मात्र देव अजूनही हिरावून घेऊ शकला नव्हता. सुदैवाने त्यांच्या आईची एक किडनी त्यांना दिली जाऊ शकेल, असा एक आशेचा किरण डॉक्टरांनी दाखवला होता. मलाही तेवढंच समाधान वाटलं.

पुढे IISc-CEDT च्या शिक्क्यामुळे चांगल्या Electronics कंपनीत नोकरी लागली मला. त्याचंही श्रेय आईच्या आशिर्वादांसोबतच सरांच्या ’त्या’ सल्ल्याला द्यायला माझं मन विसरलं नाही.

नोकरीच्या व्यापात मी पुन्हा बॅंगलोरमध्ये बुडून गेलो. पण माझी आई नेहमी सरांची फोनेवर चौकशी करत असे. आणि मला त्यांच्या तब्येतीची update देत असे. तब्बल दीड वर्षांनंतर मागच्या October मध्ये सगळ्या conditions अनुकूल झाल्यानंतर सरांचं Kidney Transplant चं operation ठरलं. दीड वर्षं ते फक्त dialysis वर होते, या कल्पनेनेही किती वेदना होतात. Operation च्या काही दिवस आधी योगायोगाने मी मुंबईला गेलेलो. पण फार प्रयत्न करूनही त्यांच्या आणि माझ्या वेळा आणि भेटीचा योग जुळला नाही.

Operation यशस्वी झालं. आणि त्यांच्या आईने त्यांना किडनीरूपे पुनर्जन्मच दिला. काही महिन्यांच्या सक्त विश्रांतीनंतर सर ठणठणीत बरे होतील, आणि पूर्वीसारखं normal आयुष्य जगू शकतील, या बातमीने मी आनंदून गेलो. वाट पहात होतो, ते एका प्रत्यक्ष भेटीची.

आणि तो योग मागच्या महिन्यातच जुळून आला. सरांची तब्येत ३-४ महिन्यातच व्यवस्थित recover झालेली. कोल्हापूरला त्यांच्या गावी एका engineering college मध्ये lecturer म्हणून नोकरी लागलेली त्यांना. आणि ते काही दिवसातच मुंबई सोडून जाणार होते, म्हणून माझ्या आईने त्यांना घरी जेवायला बोलावलं होतं. नेमका मीही काही कामानिमित्त त्या दिवशी मुंबईला गेलेलो. सरांना पाहिलं आणि फार फार आनंद झाला. योग आणि भेट, दोन्ही जुळून आलेलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं तेज परत चमकताना पाहून खोल कुठेतरी समाधान वाटलं. college-company तल्या गमतीजमती, त्यांच्या लागलेली नोकरी, गावी जाऊन settle व्हायचा plan, गावची थंडी, गावी अतिस्वस्तात मिळणाऱ्या भाज्या, अशा चिक्कार गप्पा झाल्या. पुन्हा कधी त्यांची भेट होईल आणि त्यांच्याशी अशा दिलखुलास गप्पा रंगतील, हे ठाऊक नसूनही मी शुभेच्छा देऊन प्रसन्न मनाने त्यांना निरोप दिला. कारण एक आयुष्य मरणाच्या दारातून परत येऊन पुन्हा जीवनाच्या दिशेने वाटचाल करणार आहे, या जाणिवेतच माझा सगळा आनंद सामावलेला.

आणि आईचा अचानक आता फोन. ’सर गेले...’ मन सावरता सावरेना. गोठलेला मेंदू चालेना. भरलेली छाती पुन्हा श्वास घेईना.

मरणाशी जिद्‍दीने झुंज देऊन आपला जीव परत जिंकलेल्या मानवाचा यमराजाने असा पाठीत वार करून पराभव करावा !! एका मातेने आपल्या बाळाला दिलेला पुनर्जन्म नियतीने स्वतःच व्यर्थ घालवावा !! एका निष्पाप व्यक्तीचा असा दुर्दैवी अंत व्हावा !!

कारण काय ते अजूनही समजलं नाहीये मला. पण समजूनही काय फायदा ! एका चांगल्या मित्राला.. नव्हे चांगल्या व्यक्तीला मी कायमचा मुकलोय, हे कटुसत्य थोडचं बदलणार आहे त्याने !

सर.. तुम्ही जिथेही असाल तिथून ऐका.. काही ऋण फक्त व्यक्त करता येतात. फेडता येत नाहीत. आज मी जिथे आहे, ते तुमच्या M.Tech. Admission वेळच्या मार्गदर्शनामुळे आणि ’CEDT चा option' भरण्याच्या सल्ल्यामुळे आहे. तो सल्ला नसता दिलात, तर मी कुठेतरी जरूर असतो.. पण जिथे आहे तिथे मात्र नक्कीच नसतो...

(२३-०३-२०१०)
(हा लेख म्हणजे केवळ माझी जेके सरांबद्‍दलची कृतज्ञता असून त्यामागे अन्य कुठलाही हेतू नाही.)

2 टिप्‍पणियां:

  1. छान. फारच भावनिक हो‍ऊन लिहिला आहेस लेख.

    जवाब देंहटाएं
  2. तुझ्या प्रतिक्रियेनंतर पुन्हा एकदा मीच वाचला लेख.. शेवटचे २-३ परिच्छेद वाचताना तर मीच पुन्हा हललो...

    जवाब देंहटाएं